best news portal development company in india

सांगलीत भाजपच्या बैठकीत जोरदार राडा, पडळकरांच्या उमेदवारीला भूमिपुत्रांचा विरोध, दोन गटांतील समर्थक भिडले

SHARE:

सांगलीत भाजपच्या बैठकीत गोपीचंद पडळकर आणि पाटील समर्थक आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील (Sangli) जत तालुक्यात भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या बैठकीत भूमिपुत्राच्या प्रश्नावरून दोन गटात जोरदार राडा झाला. या वादामुळे भाजप अंतर्गत सुरू असणारी धुसफूस निवडणुकीच्या तोंडावरच उफाळून आली आहे. हा वाद आमदार  गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) व तमनगौडा रवी पाटील या दोन्ही गटात झाला. या बैठकीत उमेदवारीवरून रवी पाटील (Ravi Patil) यांच्या पदाधिकाऱ्यांनी जतमध्ये भूमिपुत्रालाच संधी द्यावी असा मुद्दा मांडला. याला आ. पडळकर समर्थकांनी आक्षेप घेतला. यावरूनच जोरदार वादावादीस सुरुवात झाली.

पडळकर अन् पाटील समर्थक एकमेकांना भिडल्याने तणावाचे वातावरण

या बैठकीस भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे दोन्ही बाजूने जोरदार खडाजंगी आणि वादावादी होऊन एकमेकाचे अंगावर धावून जाण्याचा प्रकार येथे घडला दोघांचे समर्थक एकमेकांना भिडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या बैठकीत जत विधानसभा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे कसा  घेता येईल यासंदर्भात चर्चा आणि उमेदवारीबद्दल पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात येत होता. वाद विकोपाला जात असल्याचे लक्षात येताच ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरली, प्रभारी रमेश देशपांडे, तमनगौडा रवी पाटील, प्रभाकर जाधव आप्पासाहेब नामद, दिग्विजय चव्हाण  आदींनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.


भाजपमधील अंतर्गत वातावरण प्रचंड तापले

जत विधानसभेसाठी भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर येथे इच्छुक आहेत. तर जत मधून तमन्नागौडा रवी पाटील, प्रकाशराव जमदाडे देखील इच्छुक आहेत. जतमध्ये पडळकर इच्छुक झाल्याने स्थानिक भूमिपुत्र  आणि पडळकर समर्थक यांच्यात गेल्या सहा महिन्यापासूनच अंतर्गत धुसफूस  सुरू आहे. पक्षाने अजून कोणालाही उमेदवारी दिल्याचा शब्द दिला नसला तरी दोन्ही गटाकडून उमेदवारी आपणालाच असा दावा केला जात आहे. शिवाय  इच्छुकांकडून जोरदार मोर्चे बांधणी देखील करण्यात येत आहे. उमेदवारीच्या याच प्रश्नावरून  जत भाजपमधील अंतर्गत वातावरण प्रचंड तापले आहे. त्याचा पहिला स्फोट शनिवारी प्रभारी रमेश देशपांडे यांनी आयोजित केलेल्या बैठकीतच झाला. शिवाय निवडणूक जवळ येईल तसे उमेदवारीच्या प्रश्नावरून वातावरण आणखीन चिघळत जाण्याची शक्यता  आहे. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते आता जत विधानसभेचा तिढा कसा सोडवणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Maharashtra Live 24
Author: Maharashtra Live 24

Maharashtralive24

best news portal development company in india